सहा महिन्यांपासून रखडलेले काम अद्याप अपूर्ण; पावसाळ्यात वाहतुकीची भीती
धारणी / प्रतिनिधी
मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कुटंगा ते बैरागड या महत्त्वाच्या मुख्य रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असले तरी अद्यापही ते अपूर्ण अवस्थेत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना रस्त्याचे काम रखडल्यामुळे पहिल्याच पावसात या मार्गाची दुरवस्था होऊन वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी आक्रमक मागणी कुटंगा आणि बैरागड येथील ग्रामस्थांनी केली आहे.
माहितीनुसार, कुटंगा ते बैरागड या मुख्य रस्त्याच्या कामाला सुमारे सहा महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. रस्त्याचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र संबंधित कंत्राटदार आणि प्रशासनाच्या संथ कारभारामुळे हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असून अद्यापही अर्धवट अवस्थेतच आहे.
हा रस्ता परिसरातील अनेक गावांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सध्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून खडी पसरलेली आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर या अर्धवट रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.
विशेषतः रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवा या मार्गावर अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वेळेत काम पूर्ण झाले नाही तर वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण होऊन अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित कंत्राटदाराला काम जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.










