उमरगा / प्रतिनिधी
तुगाव (ता. उमरगा) येथील बौद्ध युवक भालचंद्र कांबळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी दि. २९ रोजी उमरगा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन आंबेडकरी जनतेच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयाला देण्यात आले आहे.
निवेदनानुसार, भालचंद्र कांबळे हे आपल्या मित्रांसमवेत जळकोट येथे हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण करून परतत असताना रोहित दीपक जोमदे, पंकज शंकर जोमदे, चाँद फकीर आणि गहिनीनाथ जोमदे यांनी त्यांना अडवून शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या हल्ल्यात भालचंद्र कांबळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर त्याच दिवशी मुरूम येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
मात्र, उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार असल्याचा आरोप आंबेडकरी जनतेच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे फरार आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी २९ मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर निवेदनावर रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी एस. के. चेले, हरीश डावरे, धीरज बेळम्बकर, अर्जुन मुके, संजय कांबळे, दगडू भोसले, प्रदीप भालेराव, खंडू भंडारे, रत्नदीप सोनकांबळे, बाबासाहेब गायकवाड, काकासाहेब भंडारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.










