पिंपरी-चिंचवड / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड परिसरातील भारत गॅस एजन्सींमध्ये ग्राहकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना प्रथम पावती घेण्यासाठी एका रांगेत तासन्तास उभे राहावे लागत असून, त्यानंतर ओटीपी पडताळणीसाठी दुसऱ्या रांगेत थांबावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांचा वेळ व मानसिक त्रास वाढत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
एजन्सीमध्ये लावण्यात आलेल्या फलकानुसार, “मा. कलेक्टर यांच्या आदेशानुसार सिलेंडर बुकिंग केल्यानंतर घरपोच सिलेंडर मिळेल. डिलिव्हरी कोडशिवाय सिलेंडर वितरण होणार नाही,” असे नमूद करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात या प्रक्रियेमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार वर्गाला तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ग्राहकांनी एजन्सी प्रशासनाने अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते किशोर भंडारी यांनीही नागरिकांच्या अडचणींकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ग्राहकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गॅस वितरण प्रक्रियेत सुधारणा करून नागरिकांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा आता सर्वसामान्य ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.






