पनवेल | प्रतिनिधी
महाराष्ट्राला डिजिटल क्रांतीच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत नवी मुंबई, पनवेल आणि खालापूर परिसरात डेटा सेंटर आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
राज्यातील नवी मुंबई परिसर आता केवळ औद्योगिक किंवा निवासी शहर म्हणून नव्हे, तर देशातील प्रमुख ‘डेटा सेंटर हब’ म्हणून विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. महापे आणि आसपासच्या भागात अनेक मोठे डेटा सेंटर प्रकल्प आधीच सुरू असून, या क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत आहे.
या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील शीळ-महापे परिसरात सुमारे २५ एकर, तर पनवेल तालुक्यातील चिंध्रण, महाळुंगी आणि कानपोली परिसरात तब्बल ४२० एकर जागेचे संपादन सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी अत्याधुनिक डेटा सेंटर क्लस्टर, आयटी पार्क आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत.
डेटा सेंटर उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर वीज आणि पाण्याची आवश्यकता असते. महाराष्ट्रात ही दोन्ही संसाधने उपलब्ध असल्यामुळे परदेशी तसेच देशातील नामांकित कंपन्यांची मोठी गुंतवणूक या भागात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याबरोबरच डिजिटल क्षेत्रात महाराष्ट्राचे महत्त्व अधिक वाढणार आहे.
नवी मुंबईनंतर आता खालापूरला राज्यातील तिसरे महत्त्वाचे डेटा सेंटर क्लस्टर म्हणून विकसित करण्याचे नियोजन सुरू आहे. या माध्यमातून आयटी, फिनटेक, लॉजिस्टिक पार्क, स्टुडिओ अपार्टमेंट्स, मनोरंजन केंद्रे आणि इतर पूरक उद्योगांनाही प्रोत्साहन मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे हजारो तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कौशल्य असलेल्या युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या या औद्योगिक पट्ट्यात रिलायन्स, एनटीटी ग्लोबल, कॅपजेमिनी, माईंड स्पेस यांसारख्या नामांकित कंपन्या कार्यरत आहेत. नव्या प्रकल्पांमुळे नवी मुंबई आणि परिसर डिजिटल, स्मार्ट आणि जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान केंद्र म्हणून उदयास येण्याची चिन्हे दिसत आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या डिजिटल विकासाला नवी दिशा मिळणार असून, नवी मुंबई आणि खालापूर भविष्यात देशातील सर्वात महत्त्वाचे तंत्रज्ञान आणि डेटा व्यवस्थापन केंद्र म्हणून ओळखले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.







