आजरा | प्रतिनिधी
एरंडोळ (ता. आजरा) येथे कोकण विकास सोसायटी, पणजी, सामाजिक संवेदना संस्था, आजरा आणि ग्रामपंचायत एरंडोळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘WeLead’ अंतर्गत पंचायत राज नेतृत्व विकास कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला एरंडोळ, पारपोली, पेरणोली, गवसे, हाळोली आणि कानोली परिसरातील महिला लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि महिला नेतृत्वाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सामाजिक संवेदना संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश मोरुस्कर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करत कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.
मान्यवरांचा सत्कार
यावेळी आजरा पंचायत समितीच्या नूतन सभापती जयश्री गाडे आणि उपसभापती यशोदा पोवार यांचा एरंडोळचे उपसरपंच भीमराव माधव आणि दत्त व्हिलेजचे चेअरमन शंकर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत एरंडोळच्या सरपंचपदी निवडून आलेल्या वनश्री रवींद्र देसाई यांचाही ‘WeLead’च्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.
महिलांच्या नेतृत्व विकासावर भर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कोकण विकास सोसायटीचे समन्वयक राजेंद्र कांबळे यांनी पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांच्या नेतृत्व विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण भागातील महिलांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभावी नेतृत्व करत ग्रामविकासात सक्रिय भूमिका बजावावी, असे त्यांनी सांगितले.
उद्घाटनपर भाषणात सभापती जयश्री गाडे यांनी महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्या गावातील गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. पंचायत राज व्यवस्थेचे प्रशिक्षण महिलांना अधिक सक्षम लोकप्रतिनिधी बनविण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
उपसभापती यशोदा पोवार यांनी कार्यक्रमातील महिलांचा मोठा सहभाग हा या उपक्रमाच्या यशाचा मुख्य आधार असल्याचे सांगितले.
अधिकार, कर्तव्ये आणि ग्रामविकासावर मार्गदर्शन
कार्यक्रमाच्या मुख्य वक्त्या लता पाकले यांनी पंचायत राज व्यवस्थेतील महिलांचे अधिकार, कर्तव्ये, ग्रामपंचायत प्रशासन, निधी नियोजन, ग्रामविकास, आरोग्य, पाणीपुरवठा आणि पर्यावरणपूरक विकास या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
त्यांनी सांगितले की, योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ग्रामपंचायत सदस्य अधिक जबाबदारीने आणि पारदर्शकतेने कारभार करू शकतात. यामुळे गावाच्या विकासाला गती मिळते आणि लोकसहभाग वाढतो.
या सत्रादरम्यान अनेक महिला सदस्यांनी व्यासपीठावर येऊन प्रश्न विचारले तसेच आपल्या अनुभवांची देवाणघेवाण केली. त्यामुळे कार्यक्रम अधिक संवादात्मक आणि परिणामकारक ठरला.
सामूहिक नेतृत्वाची संकल्पना
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात सामाजिक संवेदना संस्थेचे अध्यक्ष संपत देसाई यांनी ‘WeLead’ या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करताना सामूहिक नेतृत्व, सहभाग आणि कृती या त्रिसूत्रीवर भर दिला.
महिलांनी समाजव्यवस्था आणि कुटुंबव्यवस्था सक्षम ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून आता ग्रामविकासाच्या नेतृत्वातही त्या प्रभावीपणे पुढे येत आहेत, असे त्यांनी सांगितले. महिलांच्या नेतृत्वामुळे ग्रामपंचायतीचा कारभार अधिक लोकाभिमुख आणि विकासाभिमुख होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकप्रतिनिधींचा गौरव
कार्यक्रमादरम्यान विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सक्रिय महिला नेतृत्वाचा विशेष सन्मान करण्यात आला. उपस्थित महिला लोकप्रतिनिधींनी प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामविकासासाठी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपसरपंच भीमराव माधव यांनी सर्व मान्यवर, महिला प्रतिनिधी, आयोजक संस्था आणि उपस्थितांचे आभार मानले. महिला नेतृत्वाला सक्षम बनविणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांची भूमिका अधिक प्रभावी करण्याच्या दिशेने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.









