अमरावती | प्रतिनिधी
आयटकशी संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या अमरावती जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण सभा शनिवार, दि. ३० मे २०२६ रोजी नमुना ४ परिसरातील सुदामकाका देशमुख स्मृतिभवन येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत संघटनात्मक बळकटीकरण, कर्मचारी हिताचे विविध प्रश्न तसेच आगामी आंदोलनाच्या तयारीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक आणि सेवा विषयक मागण्यांवर चर्चा करण्यात आली. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अनेक मागण्या प्रलंबित असल्याने संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीची फेररचना करण्यात आली असून कॉ. रसुलशाह बिसमिल्ला शहा यांची महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या अमरावती जिल्हा महासंघाच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत करत अभिनंदन केले.
बैठकीत येत्या ८ जूनपासून नागपूर येथील मुख्यमंत्री सचिवालयासमोर होणाऱ्या राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनात अमरावती जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संघटित लढा उभारण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर कॉ. रसुलशाह यांनी संघटनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. कर्मचारी हिताच्या सर्व प्रश्नांवर संघटना ठामपणे भूमिका घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सभेला महासंघाचे जिल्हा सचिव निळकंठ ढोके, संदीप तिंतुरकर, सागर दुर्योधन, अक्षय गावंडे, राहुल बोडखे, गणेश निंबर्ते, किशोर दुतोंडे, तुळशीदास लाड, मुकुंद बनसोड, विलास कोरडे, काल्या तोटे, योगेश तायडे, सिद्धार्थ गोंडाणे यांच्यासह जिल्हाभरातील अनेक पदाधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सभेच्या शेवटी संघटनात्मक एकजूट अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटितपणे संघर्ष सुरू ठेवण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.









