जळगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्र कार्यकर्ता विकास वर्ग-१ चा भव्य समारोप
जळगाव | प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्राच्या वतीने जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता विकास वर्ग-१ चा जाहीर समारोप कार्यक्रम शनिवार, दि. ३० मे २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शहरातील मुळजी जेठा (एम. जे.) महाविद्यालयाच्या एकलव्य क्रीडा संकुल मैदानावर सायंकाळी ६.३० वाजता हा भव्य समारोप सोहळा संपन्न झाला.
एकवीस दिवस चाललेल्या या प्रशिक्षण वर्गात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी समारोप कार्यक्रमात विविध शारीरिक व सांघिक कौशल्यांचे प्रात्यक्षिक सादर केले. नियुद्ध, दंड प्रहार, सामूहिक समता, योग प्रात्यक्षिके आणि शिस्तबद्ध संचलन यांचे सादरीकरण उपस्थितांच्या विशेष आकर्षणाचा विषय ठरले.
कार्यक्रमाची सुरुवात संजय तलखेडकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. यावेळी मंचावर उज्ज्वल चौधरी, निलेश पाटील, प्रमुख पाहुणे राजेश चौधरी तसेच पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी उपस्थित होते.
२५५ प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग
या कार्यकर्ता विकास वर्गामध्ये डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, कामगार, महाविद्यालयीन युवक आदी विविध क्षेत्रांतील एकूण २५५ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ३३ संघ शिक्षक आणि ७५ कार्यकर्ते कार्यरत होते.
दररोज पहाटे ४.३० ते रात्री १० वाजेपर्यंत वर्गाचे सत्र चालत होते. यामध्ये बौद्धिक मार्गदर्शन, शारीरिक प्रशिक्षण, योगाभ्यास, गीत गायन, संघटनात्मक कार्यपद्धती आणि व्यक्तिमत्त्व विकासाशी संबंधित विविध उपक्रमांचा समावेश होता.
“संघ ही केवळ संस्था नाही, तर एक विचार आहे”
प्रमुख पाहुणे राजेश चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे केवळ संघटन नसून एक जीवनदृष्टी आहे. संघाचे कार्य चरित्रनिर्मितीचे असून स्वयंसेवक भारतमातेच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करतात. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी संघ सातत्याने कार्यरत आहे.”
“समतायुक्त, शोषणमुक्त समरस समाज घडविणे हेच ध्येय”
प्रमुख वक्ते बाळासाहेब चौधरी यांनी संघाच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. आज संघाचे कार्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. समाजातील एकात्मता, संघटन आणि राष्ट्रीय भावना दृढ करण्यासाठी संघ कार्यरत आहे.”
ते पुढे म्हणाले, “इतिहासात एकजुटीच्या अभावामुळे देशावर अनेक परकीय आक्रमणे झाली. समाज संघटित राहावा आणि राष्ट्रभावना दृढ व्हावी या उद्देशाने डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. आज समाजात एकात्मता वाढत असून स्वयंसेवक समाजाला जागृत, सजग आणि सक्षम करण्याचे कार्य करत आहेत. संघाला समतायुक्त, शोषणमुक्त आणि समरस समाजाची निर्मिती करायची आहे.”
४ हजारांहून अधिक नागरिकांची उपस्थिती
समारोप कार्यक्रमाला जळगाव शहरासह परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, युवक, महिला आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सुमारे ४ हजार नागरिक उपस्थित असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पोळ्यांचे संकलन करण्यात आले होते. या उपक्रमात महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
शिस्त, राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि संघटनशक्तीचे दर्शन घडविणारा हा समारोप सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.









