वर्धा | प्रतिनिधी
ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणेला अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी कारंजा (घा.) तालुक्यातील गारपीट गावाला भेट देत रात्रीचा मुक्काम केला. यावेळी आयोजित ग्रामसंवाद कार्यक्रमात त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून विविध समस्यांची माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली रसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच तहसीलदार अनिल निनावे, अप्पर तहसीलदार नेहा मावस्कर, गटविकास अधिकारी अरुण इंगळे, विस्तार अधिकारी वानखेडे, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायंकाळी ७.३० वाजता झालेल्या ग्रामसंवाद कार्यक्रमात ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्यांची दुरवस्था, वीजपुरवठा, स्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांबाबतच्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. नागरिकांच्या समस्या शांतपणे ऐकून घेत जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
गढूळ पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे निर्देश
गावात सध्या गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी शुद्ध व नियमित पाणीपुरवठ्याची मागणी केली. या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे आदेश दिले.
बंद पथदिवे सुरू करण्याचे आदेश
ग्रामस्थांनी गावातील अनेक रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्याची तक्रार केली. तसेच तेंदूपत्ता बोनस अद्याप मिळालेला नसल्याचेही निदर्शनास आणून दिले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विद्युत विभागाला बंद पथदिवे त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले, तर इतर तक्रारींबाबतही आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
घरकुल लाभार्थ्याला चावी सुपूर्द
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या हस्ते घरकुल योजनेचे लाभार्थी राठोड यांना त्यांच्या नव्या घराची चावी सुपूर्द करण्यात आली. तसेच त्यांच्या गृहप्रवेशाचा कार्यक्रमही पार पडला. यामुळे लाभार्थी कुटुंबाने समाधान व्यक्त केले.
बेरोजगार तरुणांसाठी कौशल्य प्रशिक्षणावर भर
ग्रामसंवादादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील बेरोजगारी आणि आरोग्य सुविधांचाही आढावा घेतला. बेरोजगार युवकांना त्यांच्या कौशल्यांनुसार रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.
शासन योजनांमध्ये सक्रिय सहभागाचे आवाहन
ग्रामस्थांनी शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभ घ्यावा, रोजगार निर्मिती, स्वच्छता, ग्रामविकास आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी यावेळी केले.
ग्रामीण भागातील समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या गावभेटीचे ग्रामस्थांनी स्वागत केले. प्रशासन गावपातळीवर येऊन लोकांशी संवाद साधत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.



