शहादा,दि.29 (का.प्र.)
शुक्रवार आयोजित करण्यात आलेली शहादा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा कमालीची वादळी आणि ऐतिहासिक ठरली. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या जोरदार खडाजंगीमुळे राजकीय वातावरण प्रचंड तापले होते. घनकचरा व्यवस्थापन, बांधकाम आणि आरोग्याच्या मुद्द्यांवरून सभागृहात अक्षरशः ठिणग्या उडाल्या. त्यातच बांधकाम सभापती संतोष वाल्हे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिल्याने खळबळ माजली.
नगरपालिकेच्या कै.काशिनाथ सजन पाटील सभागृहात दुपारी ठीक साडेतीन वाजता या सभेला सुरुवात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अभिजीत पाटील होते, तर उपनगराध्यक्षा सौ. माधवी मकरंद पाटील व मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. विषय पत्रिकेवरील एकूण ३० विषयांपैकी १८ विषयांना मंजुरी देण्यात आली, ८ विषय नामंजूर करण्यात आले, तर ४ विषय स्थगित ठेवण्यात आले. दरम्यान, आयत्या वेळच्या सर्व विषयांना सभागृहाने मंजुरी दिली.
मुख्याधिकारी-नगराध्यक्षांना धरले धारेवर-
सभेची सुरुवात शांततेत झाली असली तरी, बांधकाम सभापती संतोष वाल्हे यांनी ३ ते ४ कळीच्या मुद्द्यांवरून थेट मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना धारेवर धरत जाब विचारण्यास सुरुवात केली. घनकचरा व्यवस्थापन आणि स्थापत्य बांधकामाच्या विषयांवरून वाल्हे यांची मुख्याधिकारी तसेच बांधकाम अभियंत्यांशी जोरदार खडाजंगी झाली.वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर चर्चा सुरू असताना संतोष वाल्हे आणि अॅडव्होकेट दानिश पठाण यांच्यात असंविधानिक शब्दांच्या वापरावरून जोरदार शाब्दिक चकमक उडाली. सभागृहातील वातावरण कमालीचे तापल्याने, नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी संतप्त होत संतोष वाल्हे यांना निलंबित करण्यात यावे अशी नोंद घेण्याची थेट सूचनाच सभा लिपिकाला दिली. नगराध्यक्षांच्या या भूमिकेमुळे सभागृहात एकच शांतता पसरली.
प्राथमिक शाळा इमारत आणि आरोग्य विभागावरून प्रशासन लक्ष्य-
सभेत मुनेश जगदेव यांनी प्राथमिक शाळांच्या इमारतींच्या कामासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीबाबत तीव्र हरकत घेतली, ज्यावर सभागृहात मोठी चर्चा झाली. तसेच आरोग्य विभागाच्या कारभारावरूनही नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला.आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी फक्त उत्तरे देऊन वेळ निभावून नेतात. सत्ताधारी आणि प्रशासनाने सभागृहाची दिशाभूल करू नये. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने उत्तरे दिली पाहिजेत,” अशी आक्रमक मागणी यावेळी सदस्यांनी केली.विषय क्रमांक २८ व २९ वर सर्वच सदस्यांनी हिरीरीने चर्चेत भाग घेतला. काही विषयांवर सत्ताधारी व विरोधकांचे एकमत दिसले, तर अनेक विषयांवर तीव्र मतभेद चव्हाट्यावर आले.वादविवादाच्या गदारोळातही आयत्या वेळच्या काही महत्त्वपूर्ण विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली, यामध्ये कुकडेल भागातील पोलीस चौकीची उभारणी.पोलीस स्टेशन प्रवेशद्वारावरील अडथळे दूर करणे.शहरातील उघड्यावरील मांस विक्री तातडीने बंद करणे.राणा प्रताप स्मारक उभारणे.स्वर्गीय पी. के. अण्णासाहेब पाटील यांच्या स्मारकाचा विषय निघताच भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी त्याला एकमुखी मंजुरी दिली. यावर नगराध्यक्षांसह सत्ताधारी सदस्यांनी, सदर विषयातील सर्व कायदेशीर बाबी तपासून मंजुरी देण्यात येईल, असे स्पष्ट केले.
दरम्यान , घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ भारत अभियानावरून विरोधक आक्रमक झाले. विरोधी गटाचे हरीश पाटील यांनी प्रशासनाला थेट सुनावले की, शहरातील घनकचरा व्यवस्थापन करणे शक्यच नसेल तर निधी परत जाऊ द्या, स्वच्छ भारत अभियानाच्या बाबतीत आपण भविष्यात ठोस निर्णय घेऊ!”त्यांच्या या भूमिकेमुळे प्रशासनाच्या नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सभेत उपनगराध्यक्षा सौ. माधवी मकरंद पाटील, प्रतोद ज्ञानेश्वर चौधरी, हरीश पाटील, भावना कदम, सागर मराठे, मुनेश जगदेव आणि वसीम तेली यांनी विविध विषयांवर अत्यंत अभ्यासपूर्ण शब्दांत आपली मते मांडली. एकूणच आजची सर्वसाधारण सभा विकासकामांपेक्षा आरोप-प्रत्यारोप आणि वादळी घडामोडींमुळेच चर्चेचा विषय ठरली आहे.










