सर्वप्रथम क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन ॥ महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये फुले दाम्पत्यांच्या सामाजिक,शैक्षणिक व धार्मिक कार्याची, विचारांची व तत्त्वांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, जनजागृती व्हावी या उद्देशाने फुले दांपत्यांच्या या सर्व कार्याचा त्यांच्या समतेच्या तत्त्वांचा संदेश देणारा ५० फूट लांबीचा प्रेरणादायी ‘भिडेवाडा चित्ररथ’ नुकताच अमरावती येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ( इर्विन चौक ) येथे पोहोचला.
तेव्हा ‘ भिडेवाडा चित्ररथाचे ‘ अमरावतीकरांनी उत्साहात स्वागत केले आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना अभिवादन केले. बुद्ध,फुले,शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर निष्ठा असणाऱ्या शेकडो नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी या भव्य भिडेवाडा चित्ररथाचे दर्शन घेतले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी उपमहापौर डॉ. गणेश खारकर,उपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष
समाजभूषण – सत्यशोधक प्रा.श्रीकृष्ण बनसोड, कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी तसेच अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी फुले दांपत्यांना अभिवादन करून त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याविषयी व भव्य अशाच भिडेवडा चित्ररथाविषयी अनमोल माहिती भाषणातून दिली.
‘भिडे वाडा चित्ररथ’ बघून भिडेवाड्यातील फुले दांपत्याच्या पूर्वस्मृती येथे जागृत होताना दिसल्या.
पुणे येथील ऐतिहासिक भिडेवाड्याचा उल्लेख आणि तिथे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली देशातील पहिली मुलींची शाळा, हा इतिहास प्रत्येकाचे मन हेलावून सोडणारा आणि तितकाच प्रेरणा देणारा आहे. पुण्यातील भिडेवाडा हा केवळ दगडा-विटांचा वाडा नसून भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि विशेषतः स्त्री शिक्षणाच्या इतिहासातील एक क्रांतीचे सूवर्णपान आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिक आणि सामाजिक परिवर्तनाचा पाया याच वास्तूत रचला गेला.हा ऐतिहासिक वाडा पुण्याच्या मध्यवर्ती भागातील बुधवार पेठेत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या समोर स्थित आहे.
या वाड्याचे मालक तात्याराव भिडे त्यांचे पूर्ण नाव शंकर रामचंद्र भिडे असे होते. या भिडे वाड्याचा चित्ररथ केवळ एक देखावा नसून दि.१ जानेवारी १८४८ ला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतीरावफुले यांनी ज्या खडतर परिस्थितीत मुलींची शाळा सुरू केली, त्या संघर्षाचे स्मरण करून देतो.शेण-दगडांचा मार सहन करूनही न डगमगता सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची जी ज्योत पेटवली, त्याचे जिवंत रूप अशा चित्ररथांमधून लोकांसमोर येत आहे.
पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाडा हा शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीचे उगमस्थान आहे.आजच्या आधुनिक काळात जेव्हा युवा पिढी हा इतिहास अशा कलात्मक चित्ररथाद्वारे बघते,तेव्हा त्यांना फुले दांपत्याच्या विचारांची आणि सामाजिक कृतज्ञतेची जाणीव होते.
”विद्येविना मती गेली,
मतीविना नीती गेली,
नीतीविना गती गेली,
गती विना वित्त गेले ,
वित्त विना शुद्र खचले,
इतके अनर्थ एका अविद्याने केले ॥”
हा महामंत्र देणाऱ्या फुले दाम्पत्याचा इतिहास चित्ररथाच्या रूपाने अवतरतो, तेव्हा तो केवळ एक देखावा उरत नाही, तर ती एक फिरती प्रबोधन शाळा बनते.ज्या सर्वसामान्य माणसाला फुले दाम्पत्यांचे कार्य माहिती नव्हते अशा सर्वसामान्य जनतेला या चित्ररथामुळे फुले दांपत्याच्या कार्याचे प्रत्यक्ष दर्शन घडले हे ही नसे थोडके.
१९ व्या शतकात जेव्हा स्त्रियांना आणि वंचित घटकांना शिक्षणाची दारे पूर्णपणे बंद होती,अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री व बहुजन समाजातील मुला – मुलींना शिक्षण देण्याचे कार्य हाती घेतले.फुले दाम्पत्यांना पुण्यात शाळा सुरू करण्यासाठी जागा मिळत नव्हती तेव्हा समाजकंटकांच्या विरोधाला न जुमानता तात्याराव भिडेंनी आपल्या वाड्यातील जागा या शिक्षणासारख्या पवित्र कार्यासाठी उपलब्ध करून दिली. दि.१ जानेवारी १८४८ रोजी याच भिडे वाड्यात भारतामधील मुलींची पहिली शाळा सुरू झाली. सावित्रीबाई जोतीराव फुले या शाळेच्या आद्य शिक्षिका आणि आद्य मुख्याध्यापिका बनल्या होत्या. त्यांच्यासोबतच फातिमा शेख यांनीही या पवित्र शैक्षणिक कार्यात शिक्षिका म्हणून अनमोल योगदान दिलेले आहे. या शाळेच्या अभ्यासक्रमात केवळ पारंपरिक शिक्षण नव्हते,तर गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे यासारखे आधुनिक विषय सुद्धा शिकविले जात असत.
पुरोगामी विचारांचे केंद्र बनलेला हा भिडेवाडा शैक्षणिक परिवर्तनाचे केंद्र बनला होता.
फुले दांपत्यांनी सुरू केलेल्या या शैक्षणिक क्रांतीला तत्कालीन सनातनी समाजाने प्रचंड विरोध केला. सावित्रीबाईंवर शेण-दगड फेकण्यापर्यंत समाजकंटकांची मजल गेली,पण सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी आपले कार्य सुरूच ठेवले.
अशा या भिडेवाड्याचे रुपांतर राष्ट्रीय स्मारकात व्हावे यासाठी महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्था, विचारवंत आणि इतिहासप्रेमीं यांनी आंदोलने सुरू केली होती.
आता शासनातर्फे आणि महानगरपालिकेतर्फे भव्य आणि अत्याधुनिक ‘क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक’ उभारण्याचे काम सुरू आहे.भिडेवाड्याचे हे स्मारक केवळ भूतकाळातील इतिहासाचे प्रतीक न राहता, भविष्यातील महिला सक्षमीकरण,आधुनिक शिक्षण आणि सामाजिक क्रांतीचे एक जिवंत केंद ठरणार आहे हे निश्चित.
फुले दाम्पत्याच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला सलाम ॥
शिक्षणाचे केंद्र । भिडेवाडा एक ।
चित्ररथ एक । अप्रतिम ॥
महात्मा फुले राज्यस्तरीय
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
साहित्यिक
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती .८०८७७४८६०९










