प्रतिनिधी : तूराब खाँ पठाण
हिंगोली जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेने कळस गाठला असून तापमानाचा पारा तब्बल ४१ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. वाढत्या उकाड्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून दुपारच्या वेळेत हिंगोली-औंढा रोडवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
प्रखर उन्हामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याने रस्त्यांवर वाहनांची वर्दळ अत्यंत कमी झाली आहे. नेहमी गजबजलेला हिंगोली-औंढा मार्ग दुपारच्या सुमारास जवळपास ओस पडलेला दिसून आला. अनेक ठिकाणी रस्त्यावर एखादे-दुसरे वाहनही दिसत नसल्याचे चित्र होते.
उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी नागरिक सावलीचा आधार घेत असून अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळत आहेत. हवामानातील वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, डोक्याचे संरक्षण करणे आणि दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
सध्या हिंगोली जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून पुढील काही दिवस तापमान उच्चांकावर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











