प्रकाशा (ता. शहादा) | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील तापी नदीच्या पवित्र तीरावर वसलेले श्रीक्षेत्र केदारेश्वर मंदिर हे “दक्षिण काशी” म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. विशेषतः धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या या तीर्थक्षेत्रात वर्षभर भाविकांची वर्दळ असते. सध्या सुरू असलेल्या पुरुषोत्तम (अधिक) मासानिमित्त येथे दर्शन व तापी स्नानासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, अपुऱ्या सुविधांमुळे भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.
धार्मिक मान्यतेनुसार तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या अधिक मासातील पौर्णिमेला विशेष महत्त्व असते. या काळात केलेले स्नान, दान, जप, तप, व्रत आणि पूजा यांना हजारपटीने अधिक पुण्यप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी या उद्देशाने राज्यासह विविध भागांतून हजारो भाविक प्रकाशा येथे दाखल होत आहेत.
मात्र, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासन आणि संबंधित विभागांकडून आवश्यक नियोजन करण्यात आले नसल्याची भावना भाविक व्यक्त करत आहेत. तापी नदीच्या पात्रात स्नानासाठी पुरेशी आणि स्वच्छ जागा उपलब्ध नसल्याने अनेकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी नदीपात्रात मोठमोठे दगड असल्याने भाविकांना सावधपणे मार्ग काढत पाण्यापर्यंत जावे लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह आलेल्या कुटुंबांना यामुळे अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
भाविकांच्या म्हणण्यानुसार, स्नानासाठी सुरक्षित घाट, बसण्याची व्यवस्था, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि योग्य दिशादर्शक फलक यांची कमतरता जाणवत आहे. नदीपात्रातील परिस्थितीमुळे अनेक भाविकांना स्नानासाठी योग्य जागा शोधावी लागत असून त्यामुळे धार्मिक विधी पार पाडताना अडथळे निर्माण होत आहेत.
स्थानिक नागरिक आणि भाविकांनी प्रशासनाकडे याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असताना सुरक्षा व्यवस्थाही अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. नदीपात्रात घसरून पडणे, अपघात होणे किंवा इतर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल भाविकांकडून उपस्थित केला जात आहे.
धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासनाने विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मतही व्यक्त होत आहे. भाविकांसाठी सुरक्षित स्नानघाट, स्वच्छता व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, विश्रांती केंद्रे आणि योग्य नियोजन करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
पुरुषोत्तम मासाच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने परिस्थितीची दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, जेणेकरून भाविकांना कोणतीही गैरसोय न होता धार्मिक विधी आणि तापी स्नानाचा लाभ घेता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











