महागाव | प्रतिनिधी : भगवान देवकर
महागाव परिसरातील बिजोरा टोल नाका हा दिवसेंदिवस अपघातांचा केंद्रबिंदू बनत चालला असून, अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे वाहनचालक आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. रविवारी (दि. 31 मे) सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा टोल नाक्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक ओव्हरलोड ट्रक बिजोरा टोल नाक्याकडे येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील ट्रकने प्रथम समोर असलेल्या मारुती कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर ट्रक थेट टोल नाक्याच्या एका बाजूच्या संरचनेवर आदळला. या धडकेची तीव्रता इतकी होती की टोल नाक्याचा काही भाग अक्षरशः उध्वस्त झाला. पुढे ट्रक रस्त्यालगत असलेल्या विद्युत दिव्याच्या खांबावर जाऊन धडकला आणि तेथेच थांबला.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बिजोरा टोल नाक्यावर अशा प्रकारच्या घटना नवीन नाहीत. यापूर्वीही अनेक ओव्हरलोड ट्रक चालकांचे नियंत्रण सुटल्याने टोल नाक्याचे नुकसान झाले आहे. काही घटनांमध्ये पेट्रोल पंप परिसरात उभ्या असलेल्या किंवा रस्त्याने जाणाऱ्या दुचाकींना धडक बसून गंभीर अपघात घडल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये सतत भीतीचे वातावरण आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, टोल नाक्यावर आवश्यक त्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नाही. अपघात रोखण्यासाठी मजबूत संरक्षक बॅरिकेड्स, प्रभावी वाहतूक नियंत्रण यंत्रणा, वेग नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळावी यासाठी आवश्यक सुविधा नसल्याचे दिसून येते. त्यामुळे वाहनांचे नियंत्रण सुटल्यास थेट टोल कर्मचाऱ्यांसह इतर वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण होतो.
स्थानिक वाहनचालकांनीही या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. टोल नाक्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात जड वाहने, मालवाहू ट्रक आणि प्रवासी वाहने ये-जा करतात. अशा परिस्थितीत सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी संबंधित प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल व्यवस्थापन कंपनीने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. विशेषतः ओव्हरलोड वाहनांवर नियंत्रण, वेगमर्यादेची कडक अंमलबजावणी, मजबूत संरक्षक भिंती व बॅरिकेड्स उभारणे आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, बिजोरा टोल नाक्यावर वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत तर भविष्यात मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










