पाथरी | प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील नेताजी सुभाष विद्यालयाच्या सन 2000-2001 दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन तब्बल २५ वर्षांनंतर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या विशेष सोहळ्यास पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण देणारे सर्व माजी शिक्षकवृंद, शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापिका श्रीमती दातार मॅडम तसेच दहावी बॅचचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर सर्व शिक्षकांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पोपळघट, अमोल चिंचाने आणि प्रदीप भस्के यांनी केले.
स्वागत नृत्याच्या माध्यमातून कुमारी स्नेहल मिसाळ हिने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेला ‘गुरुजन कृतज्ञता सोहळा’ हा विशेष आकर्षण ठरला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री टेहरे यांनी केले.
यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख करून देत शालेय जीवनातील आठवणी, गमती-जमती आणि बालपणीचे अनुभव सांगून जुन्या दिवसांना उजाळा दिला. उमेश टोके, ललित चव्हाण, विनायक बाबळगावकर, आलोक चौधरी, सुभाष अंबट, सुधाकर चिंचाणे, वैजनाथ चिंचाणे, मुनाफ खान दुर्रानी, भाग्यश्री कुलकर्णी आणि संदीप जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
सोहळ्यात शिक्षकांचा सन्मानचिन्ह आणि पुस्तके देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शालेय जीवनातील संस्कार, नैतिक मूल्यांचे महत्त्व आणि आई-वडिलांचा सन्मान करण्याचा संदेश दिला.
दहावी 2000-2001 बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेला दहा सीलिंग फॅन स्नेहभेट म्हणून प्रदान केले. तसेच दरवर्षी शाळेला आवश्यक साहित्य देण्याचा संकल्पही करण्यात आला. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी व विद्यमान उपनगराध्यक्ष आलोक भैया चौधरी यांचा शिक्षकांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
दुपारी सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. तसेच पद्माकर आढाव यांनी उपस्थितांना कुल्फीचा आस्वाद दिला. कार्यक्रमानंतर गाण्याच्या भेंड्या, संगीत खुर्ची, टंग ट्विस्टर यांसारख्या विविध खेळांमध्ये सहभागी होत सर्वांनी पुन्हा एकदा बालपण अनुभवले. शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये बसून जुन्या आठवणींना उजाळा देत मित्रांनी मनमोकळा संवाद साधला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश भंडे यांनी पुढाकार घेत सर्व शिक्षकांना निमंत्रित करण्याचे काम केले. त्यांना सुधाकर चिंचाणे, वैजनाथ चिंचाणे, योगेश गिराम, उमेश टोके, प्रकाश पोपळघट, सीमा बनकर, किरण माळी, भाग्यश्री कुलकर्णी, जयश्री टेहरे, माणिक चव्हाण, अमोल चिंचाने, प्रदीप भस्के, पद्माकर आढाव, संदीप जोशी आणि दत्ता धोपटे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती सीमा बनकर यांनी केले, तर छायाचित्रणाची जबाबदारी दत्ता धोपटे यांनी समर्थपणे पार पाडली.
२५ वर्षांनंतर भरलेल्या या स्नेहसंमेलनाने गुरु-शिष्य आणि मित्रांच्या नात्यांना नव्याने उजाळा मिळाला असून उपस्थितांसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला. 💐📚🎓










