ठाणे | प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकांसाठी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून अंतिम फॉर्म्युल्यानुसार भाजप ११, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर निवडणूक लढवणार आहे. ठाणे मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली असून येथून माजी आमदार Ravindra Phatak यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
महायुतीमध्ये जागावाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच अखेर संपुष्टात आली. शिवसेनेने सात जागांवर दावा केला होता, मात्र तिला चार जागांवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला अतिरिक्त एक जागा मिळवण्यात यश आले.
ठाणे मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर रवींद्र फाटक यांनी आनंदाश्रम येथे जाऊन Anand Dighe यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी खासदार Naresh Mhaske, गटनेते पवन कदम, विकास रेपाळे आदी उपस्थित होते.
रवींद्र फाटक हे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. यापूर्वी ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती, मात्र पक्षाने नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतरही फाटक यांनी पक्षनिष्ठा कायम ठेवत पक्षाच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू होती.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही निवडणुका रखडल्या होत्या. त्यामुळे गेल्या दोन-अडीच वर्षांपासून या जागा रिक्त होत्या. आता आवश्यक मतदारसंख्या उपलब्ध झाल्याने निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
महायुतीचे अंतिम जागावाटप
भाजप (११ जागा):
- सोलापूर
- जळगाव
- भंडारा-गोंदिया
- वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
- अमरावती
- धाराशिव-लातूर-बीड
- नागपूर
- छत्रपती संभाजीनगर-जालना
- अहिल्यानगर
- सांगली-सातारा
- नांदेड
शिवसेना (४ जागा):
- ठाणे
- नाशिक
- परभणी
- यवतमाळ
राष्ट्रवादी काँग्रेस (२ जागा):
- कोकण
- पुणे
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमधील या निवडणुकांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली असून उमेदवारांच्या प्रचाराला आता वेग येण्याची शक्यता आहे.









