धाराशिव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती ‘अहिल्या सखी मंच’च्या वतीने विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. अहिल्यादेवींचे आजोळ असलेल्या चोराखळी येथील पापनाश मंदिरात अभिषेक, पूजन व आरती करून जयंती सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.
जयंतीनिमित्त नवजात कन्यांचे स्वागत करून मातांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मातांना वस्त्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. मुलींनी यशवंत, गुणवंत आणि कीर्तिवंत होऊन माता अहिल्यादेवींच्या आदर्शांचा वारसा पुढे न्यावा, तसेच मुलींचे नाव ‘अहिल्या’ ठेवण्याचे आवाहनही मंचाच्या वतीने करण्यात आले.
अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभारातून लोककल्याण, धर्मकार्य, समाजसेवा आणि न्यायनिष्ठेचा आदर्श घालून दिला. भुकेल्यांची भूक आणि तहानलेल्यांची तहान ओळखून त्यांनी स्वतःच्या खजिन्यातून लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला. देशभर उभारलेली मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि सांस्कृतिक केंद्रे आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे नेत अहिल्या सखी मंचाने ‘अन्नपूर्णा मोफत अन्नछत्राला’ अन्नदान करून गरजू रुग्णांच्या नातेवाईकांसाठी एका दिवसाच्या भोजनाची व्यवस्था केली.
“स्नानाने देहशुद्धी, ध्यानाने मनशुद्धी आणि दानाने धनशुद्धी होते” या अहिल्यादेवींच्या जीवनमूल्यांचा प्रचार करण्यासाठी मंचाच्या वतीने विविध जनजागृतीपर उपक्रमही राबविण्यात आले. संस्कृती ही भोगावर नव्हे तर त्यागावर उभी असते आणि प्रत्येक मानवामध्ये ईश्वराचा अंश आहे, या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमात अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी अहिल्या सखी मंचच्या कार्यकारिणी अध्यक्षा डॉ. शैलजा कुलकर्णी, उपाध्यक्षा ॲड. जयश्री तेरकर, सचिव उषा लांडगे, कोषाध्यक्षा प्रमिला बावकर, सहसचिव शितल करडे, सहकोषाध्यक्षा मानसी डोलारे यांच्यासह मंचातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जयंतीनिमित्त आयोजित उपक्रमांमुळे परिसरात भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचे वातावरण निर्माण झाले होते.










