वालुज | प्रतिनिधी
संस्कार, शिस्त, धर्म, संस्कृती, शिक्षण, पर्यावरण, जलसंवर्धन आणि अध्यात्म या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून भारतीय इतिहासात अजरामर स्थान निर्माण करणाऱ्या धर्मसंवर्धिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त वालुज येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भव्य मिरवणूक, पूजन आणि समाजप्रबोधनपर उपक्रमांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात, जयघोष आणि घोषणाबाजीसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा आदर्श समाजाने अंगीकारण्याचे आवाहन केले. त्यांनी सामाजिक ऐक्य, बंधुभाव, महिला सक्षमीकरण आणि सर्वधर्मसमभाव यांचा संदेश दिला.
सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन जयंती उत्सव साजरा केल्यामुळे वालुज परिसरात भक्तीमय, प्रेरणादायी आणि सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व आयोजक, कार्यकर्ते आणि सहभागी नागरिकांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात आले.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा जागर समाजात रुजविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






