कुरुंदवाड | प्रतिनिधी
पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणाच्या निषेधार्थ आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने सोमवारी कुरुंदवाड येथील नगरपालिका चौकात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास ३ जून रोजी मजरेवाडी-बस्तवाड येथील इचलकरंजी कृष्णा पाणीपुरवठा (जॅकवेल) योजनेच्या कार्यालयाला टाळे ठोकून पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा संघटनेचे नेते धनाजी चुडमुंगे यांनी दिला.
यावेळी बोलताना धनाजी चुडमुंगे म्हणाले की, पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. इचलकरंजी येथील प्रोसेस उद्योगांमधून सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असून त्यामुळे नदीचे प्रदूषण गंभीर स्वरूप धारण करत आहे. या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील ११ गावांतील नागरिकांना बसत आहे.
प्रदूषणासाठी जबाबदार असलेल्या उद्योगांवर कारवाई करण्याऐवजी संबंधित यंत्रणा आणि इचलकरंजी महापालिका त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नदीतील रासायनिक सांडपाण्यामुळे पाणी, मासे, शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
धरणे आंदोलनाच्या पहिल्या दिवशी नायब तहसीलदार विलास भिसे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी आंदोलकांच्या भावना आणि मागण्या वरिष्ठ प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.
“पंचगंगा प्रदूषणमुक्त झालीच पाहिजे”, “रासायनिक सांडपाणी नदीत मिसळणे तातडीने थांबवावे” अशा घोषणांनी आंदोलनस्थळ दणाणून गेले. प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी दीपक पाटील, राकेश जगदाळे, अविनाश पाटील, विश्वास बालिघाटे, राजू आवळे, रशीद मुल्ला आदींनी मनोगत व्यक्त केले.
आंदोलनात नागेश काळे, बंडू बरगाले, सुनील सावंत, अभय पाटुकले, महिपती बाबर, सुदर्शन माळी, जयपाल बलवान, आप्पा बंडगर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.







