कुरुंदवाड | प्रतिनिधी
पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील ११ गावांना बसत असून, या समस्येतून कायमस्वरूपी मुक्तता हवी असेल तर पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या लढ्यात सर्व ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पंचगंगा प्रदूषणमुक्ती आंदोलनाचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केले.
कुरुंदवाड येथील भालचंद्र टॉकीजजवळील आंबेडकर चौकात २९ मे रोजी आयोजित जागर सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक रमेश भुजूगडे होते.
धनाजी चुडमुंगे म्हणाले की, कोरोना काळातील लॉकडाऊनदरम्यान पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त झाल्याचे सर्वांनी अनुभवले. इचलकरंजी येथील प्रोसेस इंडस्ट्रीजमधून बाहेर पडणारे प्रदूषित पाणी विविध ओढ्यांमार्फत थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे स्थळ पाहणी अहवाल जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर करण्यात आले आहेत. मात्र, याकडे संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
यामुळेच इचलकरंजी शहराला होणारा पाणीपुरवठा रोखण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करायची असेल तर औद्योगिक सांडपाणी नदीत येण्यापासून रोखणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
यासाठी १ आणि २ जून रोजी कुरुंदवाड नगरपरिषदेसमोरील मारुती चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनानंतरही शासनाने योग्य निर्णय घेतला नाही, तर ३ जून रोजी कुरुंदवाड-बस्तवाड येथील इचलकरंजीला पाणीपुरवठा करणारे जॅकवेल बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिला.
या वेळी कृष्णा देशमुख, दीपक पाटील, सुनील सावंत, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महिपती बाबर, रामदास मधाळे, अयुब पट्टेकरी, राकेश जगदाळे आदींनी मनोगत व्यक्त केले. त्यांनीही २ जूनच्या धरणे आंदोलनास तसेच ३ जूनच्या प्रस्तावित आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन प्रभाकर बंडगर यांनी केले, तर आभार प्रदर्शन गोपाळ चव्हाण यांनी मानले.







