परतूर | प्रतिनिधी
परतूर शहरातील वार्ड क्रमांक ४ मधील पारधीवाडा परिसरातील नागरिकांचा तब्बल ३५ वर्षांपासून सुरू असलेला घर व जमिनीच्या हक्कासाठीचा संघर्ष अखेर यशाच्या मार्गावर आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अतिक्रमण नियमितीकरण धोरणानुसार २०११ पूर्वीपासून काबीज असलेल्या घरांची व जागांची मोजणी सुरू करण्यात आली असून परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे ॲड. सुरेश काळे यांनी हा विषय माजी मंत्री तथा आमदार Babanrao Lonikar यांच्याकडे मांडला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर भूमी अभिलेख विभागामार्फत टीएलआर व एसएलआर यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
परतूर नगरपरिषदेमार्फत नागरिकांसाठी विशेष अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून, नागरिकांनी अर्जामध्ये आवश्यक माहिती भरून २०११ पूर्वीच्या वास्तव्यास किंवा ताब्यासंदर्भातील कोणताही वैध पुरावा जोडून अर्ज सादर करावा, असे आवाहन ॲड. सुरेश काळे यांनी केले आहे. या प्रक्रियेमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला घर व जमिनीच्या नियमितीकरणाचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या उपक्रमासाठी ॲड. सुरेश काळे यांनी आमदार बबनराव लोणीकर, उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड, परतूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी इंगोले तसेच भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
स्थानिक नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत करत, “हा केवळ जमिनीचा प्रश्न नसून अनेक वर्षांपासून हक्कासाठी झगडणाऱ्या शेकडो कुटुंबांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. आता आमच्या घरांवर कायदेशीर हक्क मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे,” अशी भावना व्यक्त केली.
३५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शासनस्तरावर सुरू झालेल्या या प्रक्रियेमुळे पारधीवाड्यातील शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.








