शिरूर | प्रतिनिधी
शिरूर नगरपरिषद प्रशासनामार्फत नुकत्याच राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत जप्त करण्यात आलेल्या हातगाड्या व टपऱ्या संबंधित विक्रेत्यांना कोणताही दंड अथवा शुल्क न आकारता तात्काळ परत करण्यात याव्यात तसेच त्यांच्यासाठी योग्य व नियोजित पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरसेवक निलेश पवार यांनी नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नुकत्याच झालेल्या कारवाईमध्ये शहरातील अनेक हातगाड्या व टपऱ्या जप्त करण्यात आल्या. या हातगाड्या आणि टपऱ्या अनेक गरीब व सर्वसामान्य कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असल्याने संबंधित कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले असून दैनंदिन उत्पन्नावर परिणाम झाल्याने उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, कारवाईपूर्वी विक्रेत्यांना पुरेशी पूर्वसूचना देण्यात आली नाही तसेच त्यांच्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे अनेक विक्रेत्यांना आर्थिक फटका बसला असून त्यांच्या कुटुंबांवर संकट आले आहे.
या पार्श्वभूमीवर मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करून जप्त करण्यात आलेल्या सर्व हातगाड्या व टपऱ्या संबंधितांना कोणताही दंड अथवा शुल्क न आकारता परत देण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवक निलेश पवार यांनी केली आहे. तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून हातगाडी व टपरीधारकांसाठी नियोजित, सुरक्षित आणि कायमस्वरूपी पर्यायी जागेची व्यवस्था करण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी केली.
पर्यायी जागा उपलब्ध झाल्यास विक्रेत्यांना रस्त्याच्या कडेला अथवा फुटपाथवर व्यवसाय करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे वाहतुकीतील अडथळे कमी होतील, सार्वजनिक सुव्यवस्था राखली जाईल आणि विक्रेत्यांच्या रोजगाराचाही प्रश्न मार्गी लागेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाची प्रत मुख्याधिकारी प्रितीम पाटील यांनाही देण्यात आली. यावेळी नगरसेवक अभिजीत पाचर्णे, सागर नरवडे तसेच नगरसेविका सुनिता भुजबळ उपस्थित होत्या.
गरीबांच्या उदरनिर्वाहासाठी पुढाकार
अतिक्रमण हटाव कारवाईनंतर रोजगारापासून वंचित झालेल्या हातगाडी व टपरीधारकांना दिलासा मिळावा, त्यांच्या उपजीविकेचे संरक्षण व्हावे आणि शहरातील वाहतूक व सार्वजनिक सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने नगरसेवक निलेश पवार यांनी प्रशासनाकडे ही मागणी केल्याने संबंधित विक्रेत्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.









