कन्नड | प्रतिनिधी :
कन्नड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने वाढत्या महागाईविरोधात सोमवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी, युवक, महिला आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी माजी आमदार नामदेवराव पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका करत महागाई नियंत्रणात आणण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला. खतांच्या किमती गगनाला भिडल्या असून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मात्र सरकारला याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
माजी उपनगराध्यक्ष अब्दुल जावेद सेठ यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. महागडी खते आणि शेतीवरील वाढलेला खर्च उधारीवर भागवून शेतकरी उत्पादन घेतो, मात्र पीक बाजारात आल्यानंतर त्याला योग्य भाव मिळत नसल्याने तो आर्थिक संकटात सापडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आंदोलनादरम्यान पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. वाढती महागाई तात्काळ नियंत्रणात आणावी, अन्यथा अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यानंतर विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सोनवणे यांना देण्यात आले.
या आंदोलनात नगराध्यक्ष फरीन बेगम, अहमद अली भैया, अजीज नगरसेवक, तारक सेठ, शहाबाज बागवान, संजय भालेराव, योगेश अंभोरे, मोगल वाघ, राजू धनेधर, दिनकर जाधव, नाना भाऊ मनोहर जाधव तसेच महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष आव्हाळे यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी उपस्थित होते.
महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि कामगार वर्गाचे जीवन अधिक कठीण होत असल्याने शासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.








