वर्धा | प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वर्धा वन विभागाच्या वतीने मौजा वरुड येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विविध मान्यवर, विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्धाचे उपवनसंरक्षक हरवीर सिंग होते. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) माधव ओझे, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू व वन्यजीव) हरिलाल सरोदे, मानव-वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी कु. वैशाली भलावी उपस्थित होत्या.
कार्यक्रमात सावंगी येथील नर्सिंग कॉलेज तसेच सेवाग्राम येथील कस्तुरबा नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. तसेच लिला पुनावाला फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनीही उपस्थित राहून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधिक अधोरेखित करण्यात आले. प्रत्येक नागरिकाने पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास वन विभागातील वनपाल, वनरक्षक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून हरित आणि शाश्वत भविष्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.









