वर्धा | प्रतिनिधी
वर्धा जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी जिल्हा वाहतूक पोलीस विभागाने विशेष नाकाबंदी मोहीम राबविली आहे. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी ही मोहीम सुरू आहे.
या मोहिमेअंतर्गत ४ जून २०२६ रोजी वर्धा शहरात मार्शल पेट्रोलिंगदरम्यान पोलीस कर्मचारी चंद्रकांत तपासे, दिलीप कामडी आणि प्रदीप कोहळे यांनी इतवारा चौक येथे वाहन क्रमांक MH-32 AP-3064 ची तपासणी केली. यावेळी चालक विकास एकनाथराव डंभारे (वय ६७, रा. इंदिरानगर, आर्वी नाका, वर्धा) हे मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले.
चालकाची वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा येथे ब्रेथ अॅनालायझर मशीनद्वारे तपासणी करण्यात आली असता त्यांच्यात ६१८.५ mg% अल्कोहोल आढळून आले. त्यानंतर संबंधित चालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच वाहन चालविण्याच्या परवान्याच्या निलंबनासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, सन २०२६ मध्ये वर्धा जिल्ह्यात दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध आतापर्यंत १५० कारवाया करण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलीसांकडून सातत्याने जनजागृती करूनही काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे.
वाहतूक नियंत्रण शाखेचे आवाहन
वाहन चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये आणि स्वतःसह इतरांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा यांनी नागरिकांना केले आहे.









