रिसोड | प्रतिनिधी
रिसोड शहराला आडोळ धरणातून पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी शनिवारी (दि. ६ जून) अचानक फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली असून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिघाड दूर करण्यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून जलवाहिनी पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या तांत्रिक बिघाडामुळे शनिवारी होणारा नियोजित पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला. परिणामी शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा होऊ शकला नाही. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे.
दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असला तरी तो नेमका कधी सुरू होईल, याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
त्यामुळे शहरवासीयांचे लक्ष आता जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाकडे लागले असून पाणीपुरवठा सुरळीत होण्याची प्रतीक्षा नागरिकांना आहे.









