कचऱ्याचे ढीग, डुकरांचा उपद्रव आणि सांडपाण्यामुळे नागरिक हैराण; प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
उमरगा | प्रतिनिधी
उमरगा शहरातील स्वच्छतेच्या स्थितीबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीग, सांडपाण्याचे प्रवाह, तुंबलेले नाले आणि डुकरांचा वाढता उपद्रव यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील विविध ठिकाणांची छायाचित्रे समोर आल्यानंतर स्वच्छतेच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी शहरातील अस्वच्छतेच्या समस्येबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने काही प्रमाणात हालचाली करत स्वच्छता कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. मात्र, सुरुवातीच्या काही दिवसांनंतर परिस्थिती पुन्हा पूर्ववत झाल्याचे दिसून येत आहे.
काळे प्लॉट परिसर, एकोंडी रोड, गणू डॉक्टर प्लॉट, शिवपुरी रोड, शिंदे गल्ली, आरोग्य नगर, वडार गल्ली आदी भागांमध्ये उघड्यावर कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. अनेक नाल्यांमध्ये कचरा साचल्याने पाण्याचा निचरा होत नसून काही ठिकाणी फुटलेल्या पाइपलाइनमधून पाणी रस्त्यावर वाहत आहे. परिणामी दुर्गंधी वाढत असून डास आणि रोगजंतूंची पैदास होण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

विशेषतः कचऱ्याच्या ढिगांवर मोठ्या प्रमाणात डुकरे फिरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यासह वाहतुकीलाही धोका निर्माण होत आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
दरम्यान, पावसाळ्याची सुरुवात झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उघड्यावर पडलेला कचरा कुजून दुर्गंधी वाढणे, नाले तुंबणे आणि सांडपाणी रस्त्यावर येणे यामुळे डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो आणि त्वचारोगांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.
उमरगा हे तालुक्याचे प्रशासकीय, व्यापारी आणि सामाजिक केंद्र असून दररोज हजारो नागरिक येथे ये-जा करतात. अशा शहराची ओळख अस्वच्छतेमुळे निर्माण होत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

नागरिकांच्या मते, तात्पुरत्या स्वच्छता मोहिमांपेक्षा कचरा व्यवस्थापनाची प्रभावी यंत्रणा उभारणे, नियमित साफसफाई, डुकरांच्या उपद्रवावर नियंत्रण, फुटलेल्या पाइपलाइनची तातडीने दुरुस्ती आणि नाल्यांची नियमित स्वच्छता यांसारख्या कायमस्वरूपी उपाययोजनांची आवश्यकता आहे.
स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी उमरगा घडविण्यासाठी नगर परिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी संयुक्तपणे पुढाकार घेण्याची गरज असून, केवळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.










