आजरा
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आजरा येथे सरपंच परिषद मुंबईच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. वाढती वृक्षतोड, जंगलांना लागणारे वणवे आणि पर्यावरणाचा ढासळता समतोल यामुळे निर्माण होणाऱ्या तापमानवाढीसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षलागवड हाच प्रभावी उपाय असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, तहसीलदार समीर माने आणि वन परिक्षेत्र अधिकारी सचिन सावंत यांच्या हस्ते जांभूळ प्रजातीच्या देशी वृक्षाचे रोपण करून करण्यात आली.
१० हजार झाडांच्या संकल्पातून यशस्वी वाटचाल
प्रास्ताविकात सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजी. जी. एम. पाटील यांनी परिषदेच्या पर्यावरणविषयक उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या तीन-चार वर्षांपासून वृक्षलागवडीचे कार्य सातत्याने सुरू असून, मागील वर्षी घेतलेल्या १० हजार देशी प्रजातींच्या झाडांच्या लागवडीच्या संकल्पापैकी सुमारे ७ ते ८ हजार झाडे यशस्वीपणे जतन करण्यात आली आहेत. आगामी काळात इतर निसर्गप्रेमी संस्था आणि संघटनांच्या सहकार्याने ही चळवळ अधिक व्यापक करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
मान्यवरांचे पर्यावरण संवर्धनासाठी आवाहन
उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील यांनी सरपंच परिषदेच्या पर्यावरणपूरक उपक्रमांचे कौतुक करत इतर संस्थांनीही अशा उपक्रमांचे अनुकरण करावे, असे आवाहन केले.
तहसीलदार समीर माने यांनी वणवा निर्मूलन, वृक्षलागवड आणि शाळा परिसर सुरक्षा यांसारख्या उपक्रमांत सरपंच परिषदेचे योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगितले. महसूल विभागाच्या विविध योजना ग्रामस्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.
वन परिक्षेत्र अधिकारी सचिन सावंत यांनी मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी जंगलांचे संवर्धन आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी प्लास्टिकचा वापर टाळून जंगल परिसर प्लास्टिकमुक्त ठेवावा, असे आवाहन केले.
प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेच्या मनीषा बहनजी यांनी निसर्ग हा शांतता आणि समृद्धीचा आधार असून त्याचे संवर्धन करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले.
विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग
या वृक्षारोपण मोहिमेत आजरा तालुका व्यापारी असोसिएशन, पोलीस पाटील संघटना, आर्किटेक्ट व इंजिनिअर असोसिएशन, तालुका पत्रकार संघ, ग्रामसेवक संघटना, प्रजापिता ब्रह्माकुमारी आणि संत निरंकारी मंडळ यांच्या प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घेत वृक्षारोपण केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग तोरगले (सरपंच, मासेवाडी) आणि महिला तालुकाध्यक्षा वनश्री देसाई (सरपंच, पेरणोली) यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी सहायक गट विकास अधिकारी दिनेश शेटे, तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील, व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष वाय. जी. इंजल, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, पोलीस पाटील संघटनेचे युवराज देसाई, गीता पाटील, नगरसेवक अनिकेत चराटी, पर्यावरण निरीक्षक दत्तराज पाटील, माजी उपसभापती निवृत्ती कांबळे, भिकाजी पाटील, पत्रकार रणजित कालेकर, हसन तकिलदार यांच्यासह विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, कृषी व वन विभागाचे कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील बागवे यांनी केले, तर उपकृषी अधिकारी पी. जी. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक संकल्प
वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे जतन आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.









