जत | प्रतिनिधी
पाचशे एकराहून अधिक क्षेत्राला सिंचन सुविधा देणाऱ्या शेगाव साठवण तलाव क्र. २ मध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचल्याने तलावाची पाणी साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात घटल्याचा आरोप होत आहे. पावसाळ्यापूर्वी तलावातील संपूर्ण गाळ व कचरा काढून टाकावा, अशी ठाम मागणी शेगाव सर्वसेवा सोसायटीचे माजी चेअरमन तथा प्रगतशील शेतकरी विजयकुमार बोराडे यांनी केली आहे.
सध्या तलावात सुमारे ४० टक्के गाळ व कचरा असून केवळ ६० टक्केच पाणी साठा उपलब्ध राहत असल्याची स्थिती आहे. तलावाचे काम करताना बाहेर न टाकता टाकलेले मोठे दगड, माती तसेच झुडपांची वाढ यामुळे तलावाची क्षमता मोठ्या प्रमाणात बाधित झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या तलावावर अवलंबून असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक वर्षांपासून पाटबंधारे विभागाकडे गाळ काढण्याची मागणी केली जात आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
जर वेळेवर गाळ काढला असता तर तलावाची पाणी साठवण क्षमता वाढून हजारो एकर शेतीला अधिक लाभ मिळाला असता, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या शेकडो विद्युत मोटारींच्या माध्यमातून या तलावातून शेतीसाठी पाणी उपसा सुरू आहे.
पावसाळ्यापूर्वी आधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने तलावातील गाळ व कचरा पूर्णपणे हटवून तलावाची क्षमता पूर्ववत करावी, अशी मागणी विजयकुमार बोराडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.








