नांदेड | प्रतिनिधी (मोईन)
नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध जनहिताच्या प्रश्नांवर जोरदार मोर्चा काढून उपविभागीय कार्यालयासमोर अनोखे “पेरणी आंदोलन” करण्यात आले. नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉ. पुंडलिक आमले यांच्या पुढाकारातून बिरसा मुंडा चौकातून या आंदोलनाला सुरुवात झाली.
राज्यातील वाढती बेरोजगारी, महागाई, शेतकरी कर्जमाफी, NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार तसेच आदिवासी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करत, युवक-युवतींसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती योजना राबवण्याची गरज व्यक्त केली. तसेच NEET परीक्षेतील कथित घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडत असल्याने महागाई नियंत्रणासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
याशिवाय आदिवासी, महिला आणि वंचित घटकांच्या विकासासाठी विशेष धोरण आखावे तसेच शासकीय योजनांची पारदर्शक व प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणीही करण्यात आली.
मोर्चानंतर काँग्रेस नेत्यांनी शासनाने जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.
या आंदोलनात प्रदेश सचिव धनराज राठोड, डॉ. पुंडलिक आमले, के. मूर्ती, गिरीश नेमानीवर, ईश्वर चव्हाण, नंदिनी टारफे, सुभाष राठोड, ईसरत चिखलीकर, वसंत राठोड, अनिल बंगाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.









