परभणी | प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येकाने केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संगोपन करणेही आवश्यक आहे, हा संदेश देत मानवत न्यायालय परिसरात शनिवारी (दि. ६ जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ, मानवत यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवत न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) माननीय श्रीमती प्रांजस्वी चं. फटाले होत्या. त्यांच्या हस्ते न्यायालय परिसरात वृक्षारोपण करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी न्यायाधीश श्रीमती प्रांजस्वी फटाले, मानवत वकील संघाचे अध्यक्ष अॅड. किरण बारहाते, अॅड. मुकुंद पाटील, अॅड. हरिदास जाधव, अॅड. यशपाल पंडित, अॅड. दिनेश दशरथे, अॅड. चौधरी, अॅड. कुलथे, अॅड. सतीश चव्हाण तसेच सरकारी वकील प्रशांत लिहिणे, कोर्ट कर्मचारी वाघमारे व मस्के मामा उपस्थित होते.
पर्यावरण रक्षणाचा संदेश देताना मान्यवरांनी वाढते प्रदूषण व तापमानवाढ यावर चिंता व्यक्त केली. अधिकाधिक वृक्षारोपण व त्यांचे संगोपन हेच पर्यावरण संतुलनाचे मुख्य साधन असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयीन कामकाजासोबत सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविल्याबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात आले.
या उपक्रमात वकील संघाचे सर्व सदस्य, वरिष्ठ व कनिष्ठ विधीज्ञ तसेच न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. परिसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही घेण्यात आली.





