ठाणे | प्रतिनिधी
कळवा परिसरातील वाघोबानगर येथे सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास विविध हिंदू संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित ‘जनसेवकाचा जनसंवाद’ या १०७ व्या उपक्रमात अनधिकृत बांधकामे आणि विकासकांकडून नागरिकांची होत असलेली फसवणूक हे प्रमुख विषय चर्चेत राहिले.
यावेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि रामसेना या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी वाघोबानगर परिसरातील बांधकामाबाबत निवेदन सादर केले. त्यानंतर आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना त्यांनी प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यास परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते, असे नमूद केले. तसेच संबंधित बांधकामाबाबत तातडीने चौकशी करून नियमांनुसार कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली.
विकासकांविरोधात नागरिकांच्या तक्रारी
जनसंवाद कार्यक्रमात शहरातील विविध भागांतील रहिवाशांनी विकासकांकडून घरांचे ताबे देण्यास होत असलेल्या विलंबाबाबत तक्रारी मांडल्या. अनेक प्रकल्पांमध्ये विविध कारणे देत विकासकांकडून घरे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला.
या पार्श्वभूमीवर आमदार केळकर यांनी संबंधित विकासकांना रहिवाशांना निश्चित मुदतीत घरे देण्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या. अन्यथा नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईचा विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
म्हाडा गाळेधारकांचा प्रश्नही चर्चेत
वर्तकनगर येथील म्हाडाच्या इमारतींमधील निवासी सदनिकांचा प्रश्न मार्गी लागला असला, तरी व्यावसायिक गाळ्यांच्या हस्तांतरणाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित असल्याची बाबही बैठकीत मांडण्यात आली.
यासंदर्भात आमदार संजय केळकर यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, गाळेधारकांवर अन्याय होणार नाही, असे आश्वासन मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, कळवा परिसरातील बांधकामप्रकरणी प्रशासन कोणती भूमिका घेते आणि पुढे कोणती कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.







