शहादा | प्रतिनिधी
शहरातील प्रतिष्ठित महात्मा गांधी सहकारी गृहनिर्माण सोसायटीची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेच्या गांधी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थेचे चेअरमन यशवंत शांताराम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभासदांच्या सक्रिय सहभागातून विषयपत्रिकेवरील सर्व नऊ विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
सभेदरम्यान संस्थेच्या विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला. सभासदांनी आपली मते आणि सूचना मांडत संस्थेच्या भावी वाटचालीबाबत सकारात्मक चर्चा केली. ज्येष्ठ सभासद ज्ञानेश्वर सोनार, भीमराज धाकड, संजय तावडे, दिनेश पाटील, यशवंत ठाकरे, विठ्ठल बच्छाव आणि राणी जांभळे यांनी चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवून विविध सूचना मांडल्या.
सभेतील आयत्या वेळच्या विषयांमध्ये संस्थेच्या ताब्यात असलेल्या उर्वरित शिल्लक भूखंडाबाबतचा मुद्दा विशेष चर्चेचा विषय ठरला. या भूखंडाच्या भवितव्याबाबत संस्था पुढे कोणती भूमिका घेणार, याबाबत सभासदांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर संस्थेचे सचिव जयेंद्र चव्हाण, व्हाईस चेअरमन मोहन आप्पा पाटील आणि संचालक यशवंत पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. संबंधित भूखंडासंदर्भातील तांत्रिक बाबी, अडचणी आणि संस्थेची भावी दिशा याविषयी त्यांनी समाधानकारक स्पष्टीकरण दिल्याने सभासदांनी समाधान व्यक्त केले.
या विशेष सर्वसाधारण सभेला संस्थेचे ज्येष्ठ संचालक मानक पाटील, मोहनभाऊ राजपूत, मुकुंद भावसार, संचालिका करुणाताई पाटील आणि आशाबाई सिंधी यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते.
सभेचे वातावरण अत्यंत सलोख्याचे आणि सकारात्मक राहिले. सर्व विषयांवर एकमताने निर्णय घेत संस्थेच्या विकासासाठी एकजूट कायम असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
सभेच्या शेवटी चेअरमन यशवंत चौधरी यांनी उपस्थित सभासद, संचालक आणि पदाधिकाऱ्यांचे संस्थेच्या प्रगतीसाठी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच भविष्यातही सर्वांच्या सहकार्याने संस्थेचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास व्यक्त केला









