शहादा | प्रतिनिधी
धुळे विभागातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या शहादा आगाराला वारंवार दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत असून, नवीन बसेसचे वाटप, सुविधा विकास आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीत शहादा आगाराकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, महसूलाच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या या आगाराला विकासकामांमध्ये मात्र नेहमीच मागे ठेवले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, धुळे विभागातील इतर आगारांमध्ये अत्याधुनिक सुविधा, नवीन सेवा आणि ‘राजमाता जिजाऊ’सारख्या नव्या बसेस दाखल होत असताना शहादा आगार मात्र अजूनही जुन्या समस्यांशी झुंज देत आहे. शहादा, अक्कलकुवा, तळोदा आणि परिसरातील हजारो विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी सेवा ही दैनंदिन जीवनाची जीवनवाहिनी आहे. मात्र, या महत्त्वाच्या आगाराला नवीन बसेस आणि सुविधा देताना सातत्याने मागे ठेवले जात असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
बसस्थानकाची दुरवस्था; प्रवाशांचे हाल
शहादा बसस्थानकाची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली असून मूलभूत सुविधांचा अभाव, अस्वच्छ परिसर आणि अपुऱ्या सोयींमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, एसटी महामंडळाकडे शहादा शहरात कोट्यवधी रुपयांच्या किंमतीच्या मोक्याच्या जागा उपलब्ध असूनही त्यांचा योग्य वापर होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
डोंगरगाव रस्त्यावरील जागा सध्या झाडे-झुडपांनी व्यापलेली असून ती वापराअभावी पडून आहे. तसेच बायपास मार्गावर कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली इमारत आणि परिसरही निष्क्रिय अवस्थेत असल्याचे चित्र आहे. येथे प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असल्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात त्या केवळ कागदावरच राहिल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
‘उत्पन्न आमचे, सुविधा कुठे?’
शहादा आगार राज्य परिवहन महामंडळाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देत असतानाही त्याला समान न्याय मिळत नसल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र झाली आहे. “कमाई शहाद्याची आणि सुविधा इतरांना” अशी भावना व्यक्त करत प्रवाशांनी शहादा आगाराला त्याचा हक्काचा वाटा देण्याची मागणी केली आहे.
लोकप्रतिनिधींच्या मौनावर प्रश्न
या संपूर्ण प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधींची भूमिका देखील चर्चेचा विषय ठरत आहे. बसस्थानकाची दुरवस्था, नवीन बसेसचा अभाव आणि विकासकामांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत आमदार व खासदारांनी ठोस भूमिका घेतलेली दिसत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
याशिवाय, प्रवाशांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचा दावा करणाऱ्या विविध प्रवासी संघटनांनीही या विषयावर मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी जोर धरत आहे.
संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता
सध्या शहाद्यातील हजारो नागरिकांना एसटी सेवेशिवाय दुसरा प्रभावी पर्याय उपलब्ध नसल्यामुळे त्यांना या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी शहादा आगाराच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन नवीन बसेस, सुधारित सुविधा आणि प्रलंबित विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी होत आहे.
अन्यथा, शहादा आगारावरील अन्यायाविरोधात प्रवाशांचा संताप उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.









