वाठार-वाई मार्ग | प्रतिनिधी
वाठार ते पिंपोडे रस्त्यावर असलेला वाकडा पूल सध्या वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून पुलावरील संरक्षक कठडे अनेक दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत आहेत. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. शालेय विद्यार्थी, शेतकरी, कामगार तसेच इतर नागरिक या रस्त्याचा नियमित वापर करतात. मात्र पुलावरील संरक्षक कठडे पूर्णपणे नादुरुस्त झाल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित भाग आधीपासूनच अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत पुलावरील सुरक्षाव्यवस्था कोलमडलेली असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे एखादा गंभीर अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पुलाच्या दुरवस्थेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीबाबत जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला असून, विभागाच्या भोंगळ कारभारावर टीका होत आहे.
ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने पुढाकार घेऊन पुलावरील कठड्यांची दुरुस्ती व आवश्यक डागडुजीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी केली आहे. भविष्यात कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वीच या समस्येचे निराकरण करावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.











