रिसोड | प्रतिनिधी
रिसोड शहरातील काही भागांमध्ये महावितरणच्या कथित निष्काळजी व भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नव्याने वीज मीटर बसविण्यात आल्यानंतर प्रत्यक्ष वीज वापरापेक्षा अधिक युनिटचे वीज बिल आकारण्यात आल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित भागात नवीन वीज मीटर बसविण्यात आले होते. त्यानंतर ३ जून रोजी महावितरणकडून मीटर रीडिंग घेण्यात आले. मात्र, मीटरवर प्रत्यक्षात अत्यल्प वीज वापराची नोंद असताना ग्राहकांना अधिक युनिटचे वीज बिल देण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून महावितरणच्या बिलिंग प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नवीन मीटर बसवल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच प्रत्यक्ष वापराच्या तुलनेत जादा बिल आकारले जात असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांवर अशा चुकीच्या बिलांचा अतिरिक्त भार पडत असल्याने त्यांचे आर्थिक नियोजन विस्कळीत होत आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ग्राहकांना दुरुस्त व अचूक वीज बिल देण्यात यावे, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या त्रुटी टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
महावितरण प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि ग्राहकांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.











