शेगाव (ता. जत) : ओम साई प्रतिष्ठान, शेगाव या सामाजिक संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित “श्री शिवछत्रपती कर्तृत्व गौरव पुरस्कार” तसेच स्पर्धा परीक्षा यशवंतांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जतचे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिवाजी खिलारे, राजवर्धन कदम, निलेशकुमार महाडिक, प्रमोद दादा सावंत, परशुराम मोरे, अशोक गोरड, दादा पाटील, धोंडीराम माने, सचिन जाधव, डॉ. संभाजी देशमुख, डॉ. अक्षय कायपुरे आणि डॉ. चैतन्य पट्टणशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक समाधान माने यांनी संस्थेच्या स्थापनेपासून राबविण्यात आलेल्या सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानचिन्ह, मेडल आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
उद्घाटक डॉ. रवींद्र आरळी यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना, “ओम साई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेले समाजोपयोगी कार्य असेच निरंतर सुरू राहावे. आजचे हे छोटे रोपटे भविष्यात वटवृक्षात रूपांतरित व्हावे. संस्थेला आमच्याकडून नेहमीच सहकार्य राहील,” असे प्रतिपादन केले.
यावेळी प्रमोद दादा सावंत, डॉ. संभाजी देशमुख आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेशकुमार महाडिक यांनीही आपले मनोगत व्यक्त करून संस्थेच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष मारुती शिंदे, उपाध्यक्ष आनंदा किसवे व उपाध्यक्ष गौरी गायकवाड यांनी उपस्थित मान्यवर, पुरस्कारप्राप्त व्यक्ती, विद्यार्थी, नागरिक आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी संस्थेचे सर्व संचालक, महिला कार्यकारिणीच्या पदाधिकारी, सदस्य तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. हा सोहळा समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करणारा आणि युवा पिढीला प्रेरणा देणारा ठरला.







