आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा
कन्नड | प्रतिनिधी
जिल्ह्यातील जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ असलेल्या वेरूळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वेरूळ येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सुरेश रूपचंद बोरसे यांचा मध्यरात्री जमावाने केलेल्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नेमकी घटना काय?
प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुरेश बोरसे हे आपल्या घरी असताना घराबाहेर काही जण मद्यप्राशन करून वाहनांसह गोंधळ घालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरातील नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे त्यांनी घराबाहेर येऊन संबंधितांना शांत राहण्याचा आणि तेथून निघून जाण्याचा सल्ला दिला.
मात्र, यानंतर वाद वाढला आणि काही जणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बोरसे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
आरोपींना अटक करण्याची मागणी
या घटनेनंतर नातेवाईक आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्राही नातेवाईकांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.
परिसरात तणावपूर्ण शांतता
घटनेनंतर वेरूळ परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
शिक्षक सुरेश बोरसे यांच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, या घटनेचा निषेध विविध स्तरांतून केला जात आहे.






