शिवणी रसुलापूरचा अजिंक्य झाला पोलीस उपनिरीक्षक
प्रतिनिधी | शिवणी रसुलापूर
शिवणी रसुलापूर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील युवक अजिंक्य सुनंदाताई ओंकार ढोके यांची मुंबई पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमीत वर्षभराचे कठोर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या ५८३ प्रशिक्षणार्थींमध्ये अजिंक्य यांनी ४५ वी रँक प्राप्त करत उल्लेखनीय यश संपादन केले.
विशेष म्हणजे, यापूर्वीही अजिंक्य यांची नांदगाव खंडेश्वर येथे आरोग्य सेवक म्हणून निवड झाली होती. त्यानंतर त्यांची तलाठी पदासाठीही निवड झाली होती. मात्र, पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगत त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर मुंबई पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.
अजिंक्य यांनी आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळा, शिवणी येथे पूर्ण केले. अत्यंत सामान्य आर्थिक परिस्थितीत वाढलेल्या अजिंक्य यांनी अनेक अडचणींवर मात करत शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली. विशेष म्हणजे कोणत्याही खासगी कोचिंग क्लासशिवाय त्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर हे यश मिळवले.
अजिंक्य यांच्या यशाची बातमी समजताच शिवणी गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रशिक्षण पूर्ण करून गावात परतल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांची भव्य स्वागत रॅली काढली. गावातील विविध ठिकाणी त्यांचा तसेच त्यांच्या आई-वडिलांचा शाल, पुष्पहार आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी अजिंक्य यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाचे कौतुक करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ते आदर्श असल्याचे सांगितले.
अजिंक्य ढोके यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे सहकार्य आणि स्वतःच्या अथक परिश्रमांना दिले. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यास कोणतेही ध्येय अशक्य नसते,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी यावेळी दिला.
अजिंक्य यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शिवणी रसुलापूर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांच्या पुढील शासकीय सेवेसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे.
