प्रतिनिधी
अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात गेली ४३ वर्षे उल्लेखनीय कार्य करणारे ह.भ.प. किशोर महाराज जाधव यांना ‘आदर्श कीर्तनकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पैलवान सुभाष दादा युथ फाऊंडेशन यांच्या वतीने दिनांक ७ जून रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ह.भ.प. किशोर महाराज जाधव हे गेल्या चार दशकांहून अधिक काळ कीर्तन, प्रवचन आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य करत आहेत. देव, देश आणि धर्म यांचा प्रचार-प्रसार करताना समाजपरिवर्तनाचा संदेश देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत फाऊंडेशनच्या वतीने त्यांना ‘आदर्श कीर्तनकार’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सध्या ते महाराष्ट्र राज्य वारकरी मंच चे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असून श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ पालखी सोहळा समिती चे सदस्यही आहेत. कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत.
पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ पालखी सोहळ्यातील वारकरी, पदाधिकारी आणि भक्तगणांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
या पुरस्कार सोहळ्यास हिंदूरत्न ह.भ.प. दिलीप पाटील, ह.भ.प. शांताराम महाराज साळुंखे, ह.भ.प. सुरेंद्रनाथ कणसे, सुधीर महाराज काले आणि ह.भ.प. निरंजन महाराज कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्यामुळे वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ह.भ.प. किशोर महाराज जाधव यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या पुढील आध्यात्मिक आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

