अक्कलकोट | प्रतिनिधी
अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या वतीने १२ जून रोजी एमआरपी सुधारणा कायदा, उत्पादन शुल्काची स्पष्ट नोंद तसेच ग्राहक हिताच्या विविध मागण्यांसाठी नवी दिल्ली येथील जंतर मंतर येथे देशव्यापी आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून देशभरातील तालुका स्तरावरही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर ग्राहक पंचायत अक्कलकोटच्या वतीने मा. पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यासाठीचे निवेदन तहसीलदारांकडे सादर करण्यात आले. अक्कलकोट येथे तहसीलदार विनायक मगर यांना निवेदन देऊन ग्राहकांच्या विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी ग्राहक पंचायत अक्कलकोटचे अध्यक्ष अभिजीत लोके, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रशांत केसकर, तालुका कार्यकारिणी सदस्य महेश वागदरे, रवींद्र वाघमोडे, विश्वेश्वर करकी, राजेश राठी आणि सचिन चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व्हावे, एमआरपी व्यवस्थेत पारदर्शकता यावी आणि उत्पादन शुल्कासंबंधी माहिती ग्राहकांना स्पष्टपणे उपलब्ध व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. देशभर राबविण्यात आलेल्या या आंदोलनाला ग्राहक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
