जांब | वार्ताहर
जांब परिसरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लोहारा येथे घडली. या घटनेत शेतकरी सुरेंद्र भागडकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे २ वाजल्यापासून जांब परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास वीज कोसळली. त्यावेळी दोन बैल आणि म्हशी एका लिंबाच्या झाडाला बांधलेल्या होत्या. अचानक वीज पडल्याने दोन्ही बैल जागीच ठार झाले, तर म्हशी जखमी झाल्या.
विशेष म्हणजे, शेतीच्या कामासाठी सुरेंद्र भागडकर यांनी अवघ्या १२ दिवसांपूर्वीच हे बैल खरेदी केले होते. पावसाळी हंगामाच्या तोंडावरच ही दुर्घटना घडल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र वृत्त लिहीपर्यंत कोणतेही संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्याचे सांगण्यात आले. तसेच पंचनाम्याची प्रक्रिया देखील पूर्ण झालेली नव्हती.
दरम्यान, शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
