कोरेगाव, प्रतिनिधी : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवकाचे मत निर्णायक ठरणार आहे. अशा परिस्थितीत कोरेगाव नगरपंचायतीतील राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना नेते राजाभाऊ बर्गे यांच्या प्रभावामुळे काही नगरसेवकांचा कल महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे झुकत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजाभाऊ बर्गे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला नवचैतन्य मिळाल्याचे बोलले जात आहे. सातारा येथील गांधी मैदानावर झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात बर्गे यांच्या दमदार उपस्थितीची विशेष चर्चा झाली होती.
सध्या सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी प्रचार यंत्रणा सक्रिय झाली आहे. मात्र महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि नाराजी अद्याप पूर्णपणे दूर झालेली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मतभेदांचा परिणाम मतदानावर होणार का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी कोरेगाव नगरपंचायतीतील अनेक नगरसेवकांशी वैयक्तिक संपर्क साधण्यास सुरुवात केल्याचे समजते. दुसरीकडे महायुतीतील विविध घटक पक्षांमधील समन्वयाबाबतही चर्चा सुरू आहे.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यामुळे चर्चेत आलेले पालकमंत्र्यांचे समर्थक मुन्ना काझी यांच्यासोबत निवडणूक रणनीतीसंदर्भात बैठका झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. या घडामोडींमुळे कोरेगाव परिसरातील राजकारण अधिकच तापले आहे.
सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत महायुती एकसंघ राहणार की अंतर्गत मतभेदांचा परिणाम दिसून येणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. कोरेगाव नगरपंचायतीतील नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता असल्याने सर्वच उमेदवारांनी या भागात संपर्क वाढविला आहे.
दरम्यान, शिवसेना नेते राजाभाऊ बर्गे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई आगामी काळात कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
