आष्टी प्रतिनिधी :
आष्टी तालुक्यातील शेलारवाडी परिसरातील मालदरा शिवारात आज सकाळी वाघाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. स्थानिक शेतकरी विठ्ठल बबन पठाडे यांच्या वस्तीवरील बैलावर सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान वाघाने हल्ला केल्याने बैल गंभीर जखमी झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल पठाडे हे नेहमीप्रमाणे बैलाला पाणी पाजण्यासाठी गेले असता त्यांना बैल रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसून आला. बैलाच्या शरीरावर अनेक ठिकाणी खोल जखमा आणि चाव्याच्या खुणा आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
वन विभागाने घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे वन्यप्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले. प्राथमिक तपासात हा हल्ला वाघाने केल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. याबाबत पुढील पडताळणी सुरू असून संबंधित भागावर वन विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
या घटनेमुळे शेतकरी विठ्ठल पठाडे यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वर्षानुवर्षे शेतीकामात साथ देणारा बैल गंभीर जखमी झाल्याने परिसरातील शेतकरीही हळहळ व्यक्त करत आहेत.
दरम्यान, वन विभागाने शेलारवाडीसह परिसरातील गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शेतात किंवा वस्तीवर जाताना खबरदारी घ्यावी, रात्रीच्या वेळी एकटे फिरणे टाळावे तसेच पाळीव जनावरांची योग्य सुरक्षा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
वन विभागाकडून परिसरात गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.
