सांगली, दि. १६ :
शास्त्रज्ञांनी यंदा ‘सुपर एल निनो’चा इशारा दिल्यामुळे मान्सून लांबणे, पावसाचे अनिश्चित चक्र आणि संभाव्य दुष्काळाची स्थिती लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करणे अत्यावश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने उपसा बंदी आदेश लागू केले असून, पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी जिल्हास्तरावर महसूल मंडळनिहाय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांनी सतर्कतेने काम करून अनधिकृत पाणी उपसा रोखावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिले.
एल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात होणारी घट तसेच धरण व प्रकल्पातील उपलब्ध जलसाठ्याच्या योग्य वापराबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दूरदृश्य प्रणाली कक्षात झालेल्या या बैठकीस उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता महादेव कदम, महावितरणचे अधीक्षक अभियंता अमित बोकील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम आदी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे पोलीस अधीक्षक तुषार दोषी, महापालिका आयुक्त संजिता महापात्रा, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले की, एल निनोच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील कृष्णा-वारणा नदी, विविध जलाशये, तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, कालवे, पाझर तलाव आणि विहिरी यांतील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महसूल मंडळनिहाय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. विनापरवाना पाणी उपसा झाल्यास नियोजित पाणी वितरणावर गंभीर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने ही उपाययोजना हाती घेतली आहे.
भरारी पथकांनी आपल्या क्षेत्रातील नदीपात्र, कालवे आणि बंधारे परिसरातील जलस्त्रोतांची दररोज तपासणी करावी. अनधिकृत पाणी उपसा आढळल्यास तात्काळ आणि कडक कारवाई करावी. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ आणि केंद्रीय विद्युत कायदा २००३ अंतर्गत अनधिकृत पंप, इंजिन, पाईपलाईन व इतर साहित्य जप्त करून दंड आकारावा तसेच फौजदारी गुन्हा दाखल करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महावितरण विभागाला देखील अनधिकृत वीज जोडणी किंवा पंपासाठी होणारा विजेचा बेकायदेशीर वापर आढळल्यास तात्काळ वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
असे असेल भरारी पथकाचे स्वरूप
प्रत्येक महसूल मंडळासाठी स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकात जलसंपदा, जलसंधारण किंवा जिल्हा परिषद विभागाचे शाखा अभियंता हे समन्वयक असतील. त्यांच्यासोबत महावितरण कंपनीचे शाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता, नगरपरिषद अथवा नगरपंचायतीचे पाणीपुरवठा अभियंता, संबंधित मंडळ अधिकारी तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश राहणार आहे.
