खटाव प्रतिनिधी :
पाटण–पंढरपूर रस्त्यावरील महासुरणे गावच्या हद्दीत असलेल्या एका धोकादायक विहिरीमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर विहीर रस्त्यालगत असून, त्याठिकाणी योग्य संरक्षण भिंत अथवा सुरक्षा जाळी नसल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या भागात जवळच पूल असल्याने वाहनचालक व पादचारी दोघांसाठीही ही जागा अत्यंत धोकादायक बनली आहे. मागील काही काळात या ठिकाणी किरकोळ अपघात घडल्याच्या घटनाही समोर आल्या असून, मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांनी वारंवार संबंधित रोड कॉन्ट्रॅक्टर तसेच प्रशासनाकडे विहिरीभोवती काँक्रीट संरक्षण भिंत आणि जाळी बसवण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर मासुर्णे व निमसोड गावातील ग्रामस्थांनी तहसील कार्यालय, वडूज येथे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी त्यांची मागणी आहे.
“मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, तातडीने संरक्षण भिंत व सुरक्षा उपाय करण्यात यावेत, अशी जोरदार मागणी होत आहे.
