बोरी प्रतिनिधी –
ता. जिंतूर येथील बोरी येथे मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय राजकीय षडयंत्रातून चारठाणा येथे हलविण्यात आल्याचा आरोप करत बोरीसह परिसरातील ४४ गावांतील नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
या मागणीसाठी बोरी येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा आज सातवा दिवस असून आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. आंदोलन अधिक तीव्र करत दि. १८ जून २०२६ रोजी तब्बल १०५ नागरिकांनी मुंडन करून प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदविला.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बोरी येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर झालेले असताना हेतुपुरस्सर ते चारठाणा येथे हलविण्यात आले. त्यामुळे बोरीसह आसपासच्या ४४ गावांतील नागरिकांवर अन्याय झाला असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
या निर्णयाच्या निषेधार्थ बोरी येथील बाजारपेठ सलग तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. तसेच पुढील काळातही उपोषण आणि आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
“बोरीला मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय पुन्हा बोरीतच सुरू करण्यात यावे,” हीच आमची प्रमुख मागणी असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात मा. अजयभैय्या अशोकराव चौधरी यांच्यासह गावातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
