मारेगाव, प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव येथील मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मारेगाव ते कान्हाळगाव हा महत्त्वाचा मार्ग तालुक्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोरून जात असतानाही अद्याप या रस्त्याच्या दुरुस्तीचे कोणतेही काम सुरू करण्यात आलेले नाही.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली. तसेच संबंधित आमदारांनाही निवेदन सादर करण्यात आले. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनते. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनचालकांसह विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गावातील एखाद्या गंभीर रुग्णाला उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी नेताना या खराब रस्त्यामुळे जीव धोक्यात येऊ शकतो, अशी भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. “संबंधित प्रशासनाने प्रत्यक्ष येऊन रस्त्याची अवस्था पाहावी,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वारंवार निवेदन देऊनही प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
