निमगाव जाळी | वार्ताहार
आश्वी, जोर्वे व परिसरातील शेतकरी आणि वीजग्राहक गेल्या चार ते पाच महिन्यांपासून महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे त्रस्त झाले असून, कृषीपंप व गावठाण वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. शेतीसाठी आवश्यक असलेली वीज पूर्ण वेळ आणि पूर्ण दाबाने मिळत नसल्याने उभी पिके धोक्यात आली आहेत.
महावितरणकडून शेतीसाठी दररोज सहा तास वीजपुरवठ्याचे नियोजन असले तरी प्रत्यक्षात वारंवार फॉल्ट, कमी दाब आणि तासन्तास वीजपुरवठा खंडित राहण्याचे प्रकार सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. भर उन्हाळ्यात पाणी उपलब्ध असूनही वीजअभावी पिके वाळत चालल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत अनेकवेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या. तसेच राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही वारंवार पाठपुरावा करण्यात आला. विविध कार्यकर्त्यांनी जनसेवा कार्यालयामार्फत निवेदने देऊनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर माजी पंचायत समिती सदस्य श्री. सरूनाथ उंबरकर यांनी आश्वी व जोर्वे परिसरातील सर्व शेतकरी, वीजग्राहक आणि नागरिकांना पक्ष, गट, तट विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
“चार ते पाच दिवसांत परिस्थितीत सुधारणा झाली नाही, कृषीपंपांना पूर्ण दाबाने किमान ८ तास व गावठाणला २४ तास नियमित वीजपुरवठा झाला नाही, तर दि. १ जुलै २०२६ रोजी मांचीहिल फाटा येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा श्री. उंबरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
आंदोलनासंदर्भातील पुढील सूचना वेळोवेळी कळविण्यात येणार असून परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
