दोडामार्ग | प्रतिनिधी | दि. २१ जून २०२६
दोडामार्ग-बांदा महामार्गालगतच्या वीज खांबांवर आणि वीज वाहिन्यांवर वेलींचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, या वेली थेट तारांवर पसरल्याने कोणत्याही क्षणी वीजपुरवठा खंडित होणे, शॉर्टसर्किट होणे किंवा मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महामार्गालगतच ही धोकादायक परिस्थिती असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना हे दिसत नसेल, तर दुर्गम ग्रामीण भागातील अंतर्गत वीज वाहिन्यांची अवस्था किती बिकट असेल, याचा विचारही न केलेलाच बरा, असा संतप्त सवाल दोडामार्ग राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबू गवस यांनी उपस्थित केला आहे.
सध्या पावसाळा सुरू असून झाडांच्या फांद्या, वेली आणि झुडपांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. याचा फटका शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. अखंडित वीजपुरवठ्याचे आश्वासन देणाऱ्या महावितरणने केवळ बिल वसुलीवर भर न देता वीज वाहिन्यांच्या देखभालीकडेही गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
“वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दुरुस्ती करण्यापेक्षा संभाव्य धोके आधीच दूर करणे ही महावितरणची जबाबदारी आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा आताच सर्व वीज वाहिन्यांवरील वाढलेली झाडी, झुडपे आणि वेली हटविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी,” अशी ठाम मागणी बाबू गवस यांनी केली आहे.
