श्रीरामपूर | प्रतिनिधी :
कृषी विभाग, उमेद आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप पिक स्पर्धे अंतर्गत सहभागी झालेल्या फार्म गोल्ड शेतकरी गटाची बैठक महांकाळ वाडगाव येथे दि. २२ जून २०२६ रोजी उत्साहात पार पडली.
उपविभागीय कृषी अधिकारी श्रीरामपूर येथील प्रवीण गोसावी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित या बैठकीस सर्व गटातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निंबोळी अर्काचे महत्त्व आणि निंबोळी अर्क तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच बियाण्यांची उगवण क्षमता चाचणीही गटातील सदस्यांनी प्रत्यक्ष करून पाहिली.
कार्यक्रमात मेंटर लक्ष्मण डांगे यांनी पाणी फाउंडेशन स्मार्ट शेती ॲप विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. वनस्पतीजन्य अर्कांचे महत्त्व, दशपर्णी अर्क, लिंबू अर्क तसेच जीवामृत प्रात्यक्षिकांबाबतही माहिती देण्यात आली.
यावेळी कृषी विभागाचे उप कृषी अधिकारी नीलेश बिबवे यांनी सांगितले की, “गट संघटन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फार्म गोल्ड शेतकरी गटाने स्पर्धेत चांगला प्रतिसाद दिला असून हा गट इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
या उपक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी उल्हास राक्षे यांचे मार्गदर्शन लाभत असून श्री. सनी शेलार आणि विश्वनाथ सूर्यवंशी यांनीही गटाला भेट देऊन मार्गदर्शन केले आहे.
बैठकीला गटाचे सचिव रवींद्र पवार, गोकुळ पवार, संदीप सांगळे, बाळासाहेब आदिक, संजय मापारी, देविदास सांगळे, नानासाहेब पांढरे, नारायण पवार, वसंत पवार, हरिदास पवार, विजय पवार, संजय खुरुद, सुलताना बेग आदी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी गटाचे निमंत्रक अध्यक्ष अजित नारायण पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
